पावसासाठी महासांगवीतील महिलांचे देवाला साकडे; देवाला पाणी घालून वरुणराजाला बरसण्याची आर्त हाक
पावसासाठी महासांगवीतील महिलांचे देवाला साकडे; देवाला पाणी घालून वरुणराजाला बरसण्याची आर्त हाक
पाटोदा (प्रतिनिधी )पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून शेतात उभी केलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून बळीराजाची चिंता वाढली आहे.पावसासाठी आसुसलेल्या महासांगवी गावातील महिलांनी अनोख्या पद्धतीने देवाला साकडे घातले. महिलांनी एकत्र येऊन देवाची पूजा केली आणि देवाला पाणी घालून वरुणराजाने लवकर बरसावे, अशी आर्त प्रार्थना केली. पाऊस पडावा, शिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळावे, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.एकीकडे आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आणि दुसरीकडे पावसाअभावी कोमेजत चाललेली पिके, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणी, बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक उभे केले; मात्र आता पावसाने साथ सोडल्याने त्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.“देवा, वरुणराजाला बरसण्याची बुद्धी दे; आमच्या शेतकऱ्यांची पिके वाचू दे,” अशी आर्त भावना महिलांच्या प्रार्थनेतून व्यक्त झाली.महासांगवीतील महिलांनी केलेले हे साकडे केवळ धार्मिक परंपरा नसून पावसाअभावी हवालदिल झालेल्या बळीराजाच्या व्यथेचा आवाज आहे. आता वरुणराजाने कृपा करून जोरदार पाऊस पाडावा आणि तहानलेल्या शिवाराला जीवदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment