घरकुल गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी राजेभाऊ गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू
धारूर : प्रतिनिधी — धारूर पंचायत समिती अंतर्गत तेलगाव सर्कलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत झालेल्या घरकुल बांधकामांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे धारूर तालुका सचिव राजेभाऊ नारायण गायकवाड यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
घरकुल बांधकामातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ८ जून रोजी तक्रार निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड यांनी ३ जुलै रोजी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
मात्र, निर्देशानंतरही चौकशी व पंचनाम्याची ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी १० ऑगस्ट रोजी स्मरणपत्र दिले. त्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने अखेर आज, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती धारूर कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून संबंधित कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. घरकुल प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे धारूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment