बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बीड प्रतिनिधी :
बीड शहरात शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर वाहतुकीची व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा कायम असते. अशा परिस्थितीत शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सारडा नगरी मार्केट परिसर, जिल्हा शासकीय रुग्णालय ते पालवन चौक या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने भटकी कुत्री रस्त्यावर वावरत असतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहन दिसताच कुत्र्यांचे थवे वाहनांच्या मागे धावत भुंकत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कुत्र्यांचे निर्बीजीकरण, स्थलांतर आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या समस्येकडे वेळेत लक्ष न दिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment