पाडळी येथील अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबाला आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांची भेट
बीड, दि. ४ जून — शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील गायरान परिसरात राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातील बरडे कुटुंबावर काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात शंकर बरडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अन्यायग्रस्त कुटुंबाची आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बरडे यांच्या समन्वयातून ही भेट आयोजित करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्यात आला तसेच आवश्यक मदत साहित्यही प्रदान करण्यात आले
यावेळी बोलताना अशोक येडे यांनी सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पाडळी येथील अनेक आदिवासी कुटुंबे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही, शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होत असतील तर हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.
या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी व विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी अंकुश बरडे (संस्थापक अध्यक्ष, बालाघाटचा एकलव्य सेवा दल, बीड), रुपेश पवार (कार्याध्यक्ष, बालाघाटचा एकलव्य सेवा दल, बीड), श्रीकांत पवार, भरत पवार, अजिंक्य बरडे तसेच इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment