सुतगीरणीवरील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण — अनिल तुरुकमारे
सुतगीरणीवरील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण — अनिल तुरुकमारे
वस्त्रोद्योग मंत्रालयाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीवर प्रशासक नेमावा
बीड | प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगीरणी, केज येथील कथित गैरव्यवहार, बोगस कागदपत्रे, आर्थिक अनियमितता आणि शासनाची फसवणूक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सुतगीरणीवर तात्काळ प्रशासक नियुक्त करावा, अन्यथा दि. २५ मे २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा पीपल्स रिपाईचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी शासनाला दिला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री, समाजकल्याण मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सुतगीरणीच्या मुख्य प्रवर्तक व व्यवस्थापनाने बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून वस्त्रोद्योग विभागाकडून तब्बल ३३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उचलला आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वस्त्रोद्योग विभागाने टेस्ट ऑडिट व विशेष लेखापरीक्षण सुरू केले असून सुतगीरणीवर प्रशासक नेमण्याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच समाजकल्याण विभागाकडूनही कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ४२० चे गुन्हे व विविध तक्रारी प्रलंबित असतानाही १४ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणखी २३ कोटी रुपये मंजूर करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय व्यक्तींना हाताशी धरून प्रयत्न सुरू असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी विनोद बी. शर्मा यांच्या बदलीनंतर चार्ज सोडण्याच्या दिवशी उपयोगिता प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्याच्या समाजकल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही चौकशी झाली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची मंत्रालय स्तरावर स्वतंत्र विशेष चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी, तसेच सुतगीरणीच्या मुख्य प्रवर्तक, चेअरमन आणि संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास दि. २५ मे २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही पीपल्स रिपाईचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment