NMMS परीक्षेच्या निकालात लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालय अग्रेसर; २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र, सत्कार समारंभ उत्साहात
बीड प्रतिनिधी ( दि.२६ )भारत सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेच्या निकालात बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाने तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे.
NMMS ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी असते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दरवर्षी ₹१२,००० म्हणजेच दरमहा ₹१,००० शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरते.
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळते. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक अंगद हावळे व इतर सहशिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी दादासाहेब सुपेकर, राहुल रसाळ, गणेश आजबे, गणेश घरत आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment