रांची-दिल्ली एअर अॅम्ब्युलन्समधील सर्व ७ जणांचा मृत्यू; सोमवारी रात्री झाला होता अपघात
(यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव)
झारखंडमध्ये एअर अॅम्ब्युलन्सच्या झालेल्या अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चतरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्तांनी पीटीआयला दिली आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सला अपघात झाला. रांची येथून उड्डाण घेतल्यानंतर काहीकाळ हे चार्टर विमान रडारवरुन गायब झाले होते. दरम्यान, काही वेळानंतर त्याचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले.
बेपत्ता झाल्यानंतर लगेच अपघात
रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एअर अॅम्ब्युलन्सने सोमवारी संध्याकाळी ७.११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर हे विमान रडार दिसत नसल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला एक व्यक्ती दगावला असल्याचे सांगितले जात होते दरम्यान, आता सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उपायुक्तांनी काय माहिती दिली?
चतरा उपायुक्त कीर्तीश्री यांनी पीटीआयला अपघाताबाबत माहिती दिली. 'एअर अॅम्ब्युलन्समधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीहून दिल्लीला जात असताना विमान संध्याकाळी ७.३० च्या सुमारास बेपत्ता झाले होते. सिमरियाच्या बरियातु पंचायत परिसरात ते कोसळले,' अशी माहिती कीर्तीश्री यांनी दिली.
Comments
Post a Comment