लिंबागणेशमध्ये “शेतकरी सहवेदना दिवस” पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली
लिंबागणेश (दि.१९) – शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात “शेतकरी सहवेदना दिवस” पाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती आदर व सहवेदना व्यक्त करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेला यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली असून ती शेतकरी आत्महत्येची पहिली नोंद म्हणून ओळखली जाते.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार देशात दररोज सुमारे ४५ तर महाराष्ट्रात सुमारे १५ शेतकरी आत्महत्या करतात. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २५६ आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यातच ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तु कायदा, जमिन अधिग्रहण कायदा हे नरभक्षी शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेला जाब विचारण्यासाठी व शेतकऱ्यांचे हक्क व अस्तित्व वाचवण्यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आज (दि.१९) ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिकरीत्या अन्नत्याग (उपोषण) आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, बाळकृष्ण थोरात, अॅड. गणेश वाणी, दामोदर थोरात, दादा गायकवाड, गणपत तागड, रामकिसन गिरे, बिभिषण वाणी, संतोष भोसले, रामदास मुळे, रामचंद्र गिरे, शहादेव कोल्हे, मोहन कोटुळे, सुंदरराव जाधव, विठ्ठल कदम, सिताराम थोरात, सुरेश मोरे, शाकींदर काटकर आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment