“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा’ ! सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन
“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा’ ! सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन
बीड (दि.१६): केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गॅस टंचाई निर्माण झाली असून गॅस दरवाढ आणि व्यावसायिक गॅसवरील निर्बंधांमुळे खाणावळी बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत. तसेच घरगुती गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन बुकिंग बंद असल्याने ग्राहकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर प्रमाणेच "मोदी टेक्नॉलॉजीचा प्रचार, प्रसार करून गॅस टंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात “मोदी टेक्नॉलॉजी वापरा आणि गॅस टंचाई दूर करा” या घोषणेसह नाल्यातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. “नाल्याच्या गॅसवरील चाय पे चर्चा” या लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे केंद्र सरकार व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
सरकार आणि जिल्हा प्रशासन गॅस टंचाई नसल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी “मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” तसेच “जिल्हा प्रशासनाचा मोदींवर भरोसा नाही का?” अशा घोषणाबाजी करण्यात आली.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, मुबीन शेख, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच), सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक), गणेश धोंडरे (शिवसंग्राम नेते), राजेंद्र आमटे शेतकरीपुत्र हक्क आंदोलक), प्राचार्य डी.जी.तांदळे ( मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्वकल्याण सेवाभावी संस्था बीड)आदी सहभागी झाले.
जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर प्रमाणेच "मोदी टेक्नॉलॉजीचा अभियानाद्वारे प्रचार प्रसार करून गॅस टंचाई दूर करावी :- डॉ.गणेश ढवळे
--
जिल्हा प्रशासनाने गॅसच्या सुरळीत वितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असुन पोलिस अधीक्षक सचिव आहेत.या समितीकडे नियंत्रण, सुरळीत पुरवठ्याची जबाबदारी दिली असुन साठेबाजी करणा-यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याऐवजी जिल्हा प्रशासनाने मोदी टेक्नॉलॉजी द्वारे गॅस टंचाई दूर करावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर प्रमाणे जिल्हाभरात अभियान राबवत गस टंचाई ग्राहकांचे समाधान करावे अशी उपरोधिक टीका डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment