बीड येथील नाथ सृष्टीत मंगलमय वातावरणात फाल्गुण पौर्णिमा उत्साहात संपन्न
बीड येथील नाथ सृष्टीत मंगलमय वातावरणात फाल्गुण पौर्णिमा उत्साहात संपन्न
भदंत सुमेध बोधी यांच्या प्रभावी धम्मदेशनाने उपस्थितांना मिळाली समतेची व मानवतेची प्रेरणा
बीड (प्रतिनिधी) – भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे महासचिव तथा मुंबई येथील पूज्य भदंत सुमेध बोधी ए. यांच्या मौल्यवान व प्रभावी धम्मदेशनाने बीड येथील नाथ सृष्टी परिसर मंगलमय वातावरणात उजळून निघाला. फाल्गुण पौर्णिमेच्या पावन निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने धम्म उपासक उपस्थित राहून धम्मश्रवणाचा लाभ घेतला.
धम्मदेशनामध्ये भदंत सुमेध बोधी यांनी सांगितले की, “भूक आणि तृष्णा हे मानवी जीवनातील मोठे महारोग आहेत. मनुष्याने सम्यक विचार, सम्यक आचरण आणि कुशल कर्माच्या माध्यमातून या दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे.” त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या, मानवतेच्या आणि परिवर्तनशील विचारांची आठवण करून देत सदधम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘चिवर धारणेचा सम्यक संकल्प’ आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
“भारतभूमी ही बुद्धांची भूमी आहे. भारतात जन्मलेला प्रत्येक जण मुळतः बौद्ध आहे,” असे सांगत त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या नीतिधम्माचा चिकित्सक अभ्यास करून डॉ. आंबेडकरांनी अंधश्रद्धा, सामाजिक विषमता, लिंगभेद, वंशभेद व दैववादाविरुद्ध उभा केलेला संघर्ष अधोरेखित केला. समतामूलक व आधुनिक भारत उभारण्यासाठी वैज्ञानिक विचारांचा भक्कम पाया त्यांनी रचला, असे त्यांनी नमूद केले.
धम्म म्हणजे लोककल्याणाची वाणी असून, धम्माचा केंद्रबिंदू मानवी मन आहे. सर्व कुशल-अकुशल कर्म मनोमय असते. “जसे बैलगाडीचे चाक बैलामागे आपोआप फिरते, तसेच कर्म मनुष्याच्या मागे येते,” या उदाहरणातून त्यांनी कर्मप्रधान जीवनाचे महत्त्व स्पष्ट केले. दुःखमुक्तीचा मार्ग धम्मश्रवण व त्याचे दैनंदिन जीवनात आचरण यातच आहे, असे त्यांनी सांगितले.
सारनाथ येथे प्रथमच ध्यान, ज्ञान आणि मनाचे सार जगासमोर आले. अर्हंत सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्धांनी भारतभूमीत धम्मचक्र प्रवर्तित केले आणि तो आजही गतिमान आहे. “ज्यांनी जीवनात कुशलतेने जगण्याचे व दुःखमुक्तीचे शिक्षण घेतले नाही, त्यांना धम्माचे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन करत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.
धम्माच्या समतेच्या आणि मानवतेच्या विचारांना बळकटी देण्यासाठी समाजाने मूळ संघटनांशी सलग्न होऊन धम्मचक्राची व्याप्ती वाढवावी, असेही त्यांनी संबोधित केले.
या मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन नाथ सृष्टी येथील प्रा. गौतम खेमाडे व त्यांच्या परिवाराने केले. कार्यक्रमास जिल्हा अमरावतीचे भंते आनंद, जिल्हा बीड (प) चे अध्यक्ष महालिंग निकाळजे, समता सैनिक दलाचे राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, जि. बीड (प) चे पर्यटन उपाध्यक्ष अॅड. हणुमंत कांबळे, संघटक विष्णू कांबळे, ता. बीड अध्यक्ष राजेंद्र ससाने, ता. बीड संस्कार अध्यक्ष प्रा. गौतम खेमाडे, ता. गेवराई अध्यक्ष बोराडे, अॅड. ओमप्रकाश गायकवाड, अॅड. चंद्रवदन जाधव, अॅड. उदय तुपारे, एस. एम. जोगदंड, भिवा जोगदंड, अनिल डोळस, माजी अध्यक्ष पद्मिनाबाई गायकवाड, जाधवताई, खेमाडेताई यांच्यासह अनेक धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाल्गुण पौर्णिमेच्या या पावन सोहळ्याने बीड नगरीत समता, मानवता आणि धम्माच्या विचारांची नवचैतन्यपूर्ण जागृती घडवून आणली.
Comments
Post a Comment