पाटोदा महावितरणचा बेजबाबदारपणा! राष्ट्रीय महामार्गावर विद्युत डीपीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातून जाणाऱ्या पाटोदा मांजरसुंभा राष्ट्रीय महामार्गावर महावितरण विभागाने थेट रस्त्याच्या कडेला विद्युत डीपी बसवून ठेवला आहे. या निष्काळजी कारभारामुळे वाहनधारकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली असून, कधीही मोठा अपघात होऊ शकतो. डीपीजवळ मोठा खड्डा असून, तिथे कोणताही सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेची चिन्हे बसवलेली नाहीत.याआधीच या ठिकाणी अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, पुन्हा अशाच दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांचा संताप उफाळून आला असून त्यांनी ठाम शब्दांत इशारा दिला आहे अपघात झाल्यास महावितरण विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील. जीव गेला, तर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल! स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना महावितरणला अल्टिमेटम दिला आहे की,
मनुष्यहानी होण्याआधी ही डीपी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावा.अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून पाटोदा महावितरणच्या बेजबाबदारपणा विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल.
Comments
Post a Comment