स्वावलंबी आणि सक्षम बनण्यासाठी महिलांनी संस्कृता बनलं पाहिजे; कुलगुरू प्रो.डॉ.उज्वला चक्रदेव यांचे प्रतिपादन
स्वावलंबी आणि सक्षम बनण्यासाठी महिलांनी संस्कृता बनलं पाहिजे; कुलगुरू प्रो.डॉ.उज्वला चक्रदेव यांचे प्रतिपादन
एसएनडीटी विद्यपीठच्या कुलगुरु प्रो.डॉ.उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते तुलसी कॉलेजच्या नवीन प्रयोगशाळांचे उदघाटन
बीड (दि.०७)- एक स्त्री जेव्हा संस्कृता बनते, तेव्हा ती केवळ स्वतःसाठीच नाही, तर समाजासाठीही एक आदर्श बनते. ती स्वतःच्या कौशल्यांद्वारे समाजात बदल घडवते आणि इतर महिलांनाही प्रेरणा देते, त्यामुळे तुम्ही स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी संस्कृता बनलं पाहिजे, असे प्रतिपादन एसएन डीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय प्रो.डॉ.उज्वला चक्रदेव यांनी केले.
बीड शहरातील देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन या महाविद्यालयाच्या नूतन इमारतीतील इंग्रजी भाषा प्रयोगशाळा तसेच विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय प्रो.डॉ.उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते शनिवार ०६ मार्च रोजी संपन्न झाले, यावेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा.डॉ.साईनाथ बनसोडे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदीप रोडे होते. व्यासपीठावर देवगिरी प्रतिष्ठानच्या सचिव मा.दीपा रोडे, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनचे प्राचार्य मा. डॉ.अशोक दुलधुले आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रो.डॉ.उज्वला चक्रधर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सोबतच विद्यापीठाच्या विविध कल्याणकारी योजना राबण्याचे आवाहन केले, तसेच विद्यार्थिनींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा. तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करून माहिती गोळा करा आणि त्या आधारे व्यवसाय पुढे न्या. लहान व्यवसायापासून सुरुवात करून इतरांनाही नोकरी द्या. आई-वडिलांचा विरोध असला तरी त्यांना समजावून सांगा की व्यवसाय हा एक सुरक्षित आणि यशस्वी पर्याय आहे. स्वप्नं पाहण्याऐवजी ती साकार करण्यासाठी ठोस पावले उचला. आम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि त्यावेळी फक्त पाच विद्यार्थ्यांना घेऊन या संस्थेची सुरुवात केली. त्यांच्या दूरदृष्टीच्या स्वप्नात हे विद्यापीठ एक दिवस मोठे होईल आणि महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करेल अशी कल्पना होती. आज हे विद्यापीठ खरोखरच वटवृक्षाच्या स्वरूपात वाढले आहे, ज्याच्या छायेत हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत,असे डॉ. साईनाथ बनसोडे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे यांनी संस्था आणि महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसह सर्वांगीण प्रगती संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरूंनी महाविद्यालयातील विविध विभाग आणि विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधांची पाहणी केली. तसेच यावेळी महाविद्यालयाद्वारे फॅशन डिझाईन प्रदर्शन भरवण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून प्लॅस्टिक, कागद, फेब्रिक स्क्रॅप, आणि इतर पुनर्वापरयोग्य सामग्रीचा वापर करून विविध प्रकारचे ड्रेसेस आणि हॅण्डमेड ज्वेलरी डिझाईन केले होते. ते पाहून कुलगुरूंनी त्यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा करून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले. एकंदरीत नियोजन व सुविधा पाहून त्यानी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अस्मिता साळवे यांनी केले. प्रा.अश्विनी बेद्रे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला, तर आभार डॉ सारादी गोगई यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment