शौचालय वापरात नसल्याने विद्यार्थ्यांना घरी जावे लागते!
शौचालय वापरात नसल्याने विद्यार्थ्यांना घरी जावे लागते!
कोंबडं वस्ति जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार
“कागदोपत्रीच मोहीम राबवल्याबद्दल सीईओंनाच पुरस्कार द्या!” – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :– (दि. ०९)
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार ‘जागतिक शौचालय दिना’पासून ते ‘मानवी हक्क दिना’पर्यंत म्हणजे १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “हमारा शौचालय – हमारा अभिमान” ही विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. जिल्ह्यातील १३५६ गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी व नियमित वापर सुनिश्चित करण्यात यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले.
शौचालय म्हणजे केवळ सुविधा नव्हे तर आरोग्य, सुरक्षितता व प्रतिष्ठेची हमी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र प्रत्यक्षात काय?
अभियान फक्त कागदोपत्रीच राबवले जात असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे.
कोंबडं वस्ति शाळेची शौचालये अनेक वर्षांपासूनच बंद!
विद्यार्थ्यांची बिकट अवस्था
बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील लिंबागणेश केंद्राखालील कोंबडं वस्ती जिल्हा परिषद शाळेतील शौचालय अनेक वर्षांपासून बंद असून पूर्णपणे निकामी आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना शौचालयासाठी सरांची परवानगी घेऊन घरी जावे लागते, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
अभियानाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १० डिसेंबरला ‘उत्तम शौचालय पुरस्कार’ जाहीर होणार असल्याचे प्रशासन सांगत असताना अस्तित्वात नसलेल्या सुविधांची चमकदार कागदी नोंद मात्र व्यवस्थित तयार आहे.
यावर टीका करत डॉ. ढवळे म्हणाले –
“कागदोपत्रीच अभियान राबवल्याबद्दल सर्वात उत्कृष्ट पुरस्कार तर सीईओ जितीन रहमान यांच्याच गळ्यात टाका!”
स्थानीय प्रतिनिधींनाही माहिती नाही!
महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी आणि शाळेचे शिक्षक रोहन मुंडे यांना या विशेष मोहिमेबाबत विचारले असता,
“अभियान सुरू असल्याची कोणतीही सूचना किंवा पत्र आम्हाला प्रशासनाकडून मिळालेच नाही,”
असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
विद्यार्थ्यांची वास्तविक वेदना
सई रामचंद्र घरत – इयत्ता ४ थी
“शाळेचे शौचालय वापरातच नाही. त्यामुळे सरांना सांगून घरी जावे लागते.”
चैतन्य चांगदेव घरत – विद्यार्थी
“माझं घर लांब आहे म्हणून मी मित्र विराज घरतच्या घरी जातो.”
इतक्या मूलभूत सुविधेसाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे, ही अत्यंत उद्विग्न करणारी बाब आहे.
Comments
Post a Comment